पुसद : सध्या तीव्र उन्हाळा सुरु असून विहीरीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिर सोडून इतरत्र कोठेही सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील महिला व पुरुष यांना आपला जीव धोक्यात घालून विहीरीत उतरुन व दुरवरुन पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील धनसिंग पवार तांड्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, तांड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जीवन जगण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे. प्राणी पशुपक्षी व मानव तसेच सजीव घटकाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु आत्ताच जी.बी.एस सारख्या रोगाचा फैलाव सुरु झाला आहे. सर्व ग्रामस्थांना शुध्द पाण्याची व्यवस्था करावी कारण धनसिंग नगर या तांड्यातील लोकसंख्या जवळपास १८०० पेक्षा जास्त असून येथील नागरिकांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
सदर गावातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी हे टँकरने उपलब्ध करुन देण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय, पुसद यांच्याकडे धनसिंग पवार, तांड्यातील ग्रामस्थांनी दिप फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे.